ऑपरेशन सिंदूर हे नागरी-लष्करी समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे – संरक्षण मंत्री
नागरी-लष्करी समन्वयाचे ऑपरेशन सिंदूर हे एक उत्तम उदाहरण आहे..

- नागरी-लष्करी समन्वयाचे ऑपरेशन सिंदूर हे एक उत्तम उदाहरण आहे," - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
- तंत्रज्ञान हे केवळ एक माध्यम असावे, ध्येय नाही..
- समृध्दीला चालना देण्यासाठी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा...
PIB Mumbai : “प्रशासकीय यंत्रणेने सशस्त्र दलांसोबत अखंडपणे काम करून महत्त्वाची माहिती पोहोचवत जिथे जनतेचा विश्वास निर्माण केला, अशा नागरी-लष्करी समन्वयाचे ऑपरेशन सिंदूर हे एक उत्तम उदाहरण आहे,” असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांना राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यातील त्यांची महत्त्वाची भूमिका समजून घेण्याचे आणि शूर सैनिकांप्रमाणे अशा गंभीर परिस्थितींसाठी नेहमीच सज्ज राहण्याचे,आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. ते 29 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तराखंडमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) 100 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला संबोधित करत होते.

तरुण नागरी सेवकांना तंत्रज्ञानाच्या युगात नाविन्यपूर्ण पध्दतीने काम करण्याचे आणि लोकांच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी यावेळी केले. .संरक्षण मंत्रालयाच्या ‘संपूर्ण’ (SAMPURNA) या उपक्रमावर प्रकाश टाकत त्यांनी माहिती दिली, की ही एक कृत्रिम प्रज्ञा (AI)-चालित ऑटोमेशन प्रणाली आहे; जी संरक्षण खरेदी आणि देयकांचे पारदर्शक पद्धतीने विश्लेषण करते. तंत्रज्ञान हे केवळ एक माध्यम असावे, ध्येय नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

“तुम्ही सार्वजनिक प्रसार, सुलभता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. समृध्दीला चालना देण्यासाठी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा,” अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.नागरी प्रशासक म्हणून, प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक नागरिकाशी सहानुभूती आणि समजूतदारपणाने संवाद साधला पाहिजे,यावरही राजनाथ सिंह यांनी भर दिला. “जेव्हा अधिकारी समाजातील वंचित किंवा असुरक्षित घटकांशी संवाद साधतात तेव्हा त्यांनी हे ओळखले पाहिजे, की लोकांचे संघर्ष केवळ त्यांच्या प्रयत्नांनीच नव्हे तर व्यापक सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीने आकार घेतात,”असे ही ते पुढे म्हणाले.”हेच प्रशासकाला खऱ्या अर्थाने लोककेंद्रित आणि संवेदनशील बनवते,” असे ते पुढे म्हणाले.

प्रशासकीय सेवांमध्ये सामील होणाऱ्या महिलांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीची दखल घेत, संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आत्ताच्या यूपीएससी परीक्षेत एका महिलेने अव्वल क्रमांक पटकावला आहे आणि पहिल्या पाच उमेदवारांत तीन महिला आहेत.2047 पर्यंत अनेक महिला कॅबिनेट सचिव पदांवर पोहोचतील आणि भारताच्या विकास प्रवासाचे नेतृत्व करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



