काँग्रेससमोर ‘दोन्ही बाजूंनी आगीत हात’
काँग्रेसवर सतत टीकेचे बाण सोडले जात आहेत

- या निवडणुकीत काँग्रेससमोर अनेक आव्हान...!!
चिखली (बुलढाणा) : चिखली नगरपरिषद निवडणूक 2025 दरम्यान काँग्रेस पक्षासाठी राजकीय समीकरणे पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीची ठरत आहेत. घराणेशाही, भ्रष्टाचार, आणि बंडखोर उमेदवारी अशा तीन आघाड्यांवरून काँग्रेसवर सतत टीकेचे बाण सोडले जात आहेत. या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा जनतेसमोर डळमळीत होत असून मताधिक्य टिकवणे काँग्रेससमोर मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक नेत्यांमधील मतभेद आणि बंडखोर उमेदवारांच्या हालचालींमुळे पक्षात अंतर्गत तणाव वाढल्याचे दिसून येते. त्यातच इतर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या कार्यप्रणालीवर ‘घराणेशाहीचा ठसा स्पष्ट आहे’ अशी टीका करून प्रचाराला वेग दिला आहे.
राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, “जशी विहिरीत पाणी कमी झाले की बादलीवर ओढाताण सुरू होते, तशीच परिस्थिति काँग्रेसमध्ये दिसते.” या म्हणीप्रमाणे, सत्तेतील वाटा आणि स्थानिक नेतृत्वातील गटबाजींमुळे काँग्रेसला या निवडणुकीत आपला पाया मजबूत ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल.
लोकसभेच्या आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा उद्वेग आणि मतदारांचा मूड लक्षात घेतल्यास काँग्रेसला नव्या रणनीतीची गरज भासणार आहे. आता पाहावे लागेल की, “अडथळ्यांच्या विळख्यातही काँग्रेस नव्या दमाने यश मिळवते का, की मतदारांमध्ये ‘जशी करणी तशी भरणी’ अशी भावना निर्माण होते.”



